Wednesday, 19 December 2018

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 7

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 7

 मुलांच्या विकासाच्या ( वाढीच्या ) टप्प्यावरती पालकांनी करावयाच्या गोष्टी :-

1 ) मुलांवरील प्रेम भरभरून व्यक्त करणे –
     
प्रेम ही अशी भावना आहे ज्यासाठी प्रत्येक सजीव भूकेलेला असतो. याचमुळे मुलेदेखील आई-वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेली असतात. त्यामुळेच योग्यवेळी योग्य पध्दतीने पालकांनी आपल्या पाल्यासमोर व्यक्त केलेले प्रेम हे त्यांना प्रोत्साहन देणारे ठरते. आई-वडीलांनी आपल्या मुलांसंदर्भातचे प्रेम हे त्यांच्या शब्दातून , कृतीतून तसेच योग्य भावनेच्या माध्यमातून व्यक्त केले पाहिजे. 
   आपल्याविषयी आपल्या आई-वडीलांच्या मनात प्रेम , काळजी आहे या भावनेमुळे मुलांची मानसिक दृष्ट्या चांगली वाढ होण्यास मदत होते. मुलांवरील प्रेम व्यक्त करताना घ्यावयाची काळजी म्हणजे आपले प्रेम व्यक्त करणे म्हणजे मुलांचे फाजील लाड करणे नव्हे तर योग्यवेळी योग्य पध्दतीने आपल्याला वाटणारे प्रेम प्रकट करणे. उदा. 1) आपल्या नोकरी / व्यवसायाच्या कामातून थोडासा वेगळा वेळ काढून अशा वेळेत त्यांच्याशी संवाद साधणे किंवा त्यांना आवडणारा खेळ खेळणे. मुलांना फिरायला घेऊन जाणे. 2) झोपण्याच्या वेळेच्या अगोदर मुलांना गोष्टी सांगणे त्यांच्यासोबत सकारात्मक विषयावरती चर्चा करणे. 3) मुलांचे मित्र होऊन त्यांना आपले विचार कळू देणे 4) त्याचप्रमाणे काही प्रसंगांमध्ये प्रत्यक्ष शब्दातून बोलून आपले त्याच्यावर /तिच्यावर प्रेम आहे ते प्रकट करावे. 5) तसेच आपल्या शारीरिक हालचालीतून , हावभावातून देखील त्यांच्यावरील प्रेम प्रकट केले पाहिजे.
 

                                                                                                                             क्रमश...!
श्री.दिलीप आप्पासो माने.
https://successmv.blogspot.com/
8421699666

Saturday, 15 December 2018

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 6

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 6


पालकत्वाचे टप्पे :
3)  तिसरा टप्पा –

 शैशवावस्था – ० ते ५ वर्षे
    ‘या वयातील मुले जसजशी मोठी होतात, त्यांच्या भाषेचा विकास होतो, पण भावनांवर नियंत्रण मात्र आलेले नसते  म्हणजे मेंदूची भावनांवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा पूर्णपणे कार्यरत नसते. त्यातून लहान मुलांचे हट्ट, कधीकधी आकांडतांडव सुरू होतात. मोठे होण्याच्या प्रवासातली ही छोटीशी अवस्था आहे. त्यातून ही मुले लवकरच बाहेर येणार आहेत. आणि तसे त्यांना बाहेर येता यावे यासाठी आपल्या मदतीची गरज आहे, हे पालकांच्या लक्षात असले की, निम्मी लढाई जिंकली. आपोआपच आपण वापरत असलेली भाषा बदलते, आरोप-प्रत्यारोप थांबतात, कारणे दाखवा नोटीस काढली जात नाही, की चूक कोणाची यावर खटला भरला जात नाही. रडणारे मूल त्रासदायक आणि ताणकारक वाटत असले तरी, ते मूल असे मुद्दाम करत नाहीये, या माहितीमुळे निम्मा ताण हलका होतो, मुलाचा आणि पालकांचाही

4) चौथा टप्पा –

 किशोरावस्था – ६ ते १२ वर्षे
 मुले खूपच जिज्ञासू प्रवृत्तीची बनतात , या कालावधीतील मुलांना नवनवीन गोष्टी जाणून घ्यावयाच्या असतात. त्यामुळेच या वयातील मुलांमध्ये आपल्या आसपासच्या परिस्थितीविषयी जाणून घेण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती वाढीस लागते त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये सामाजिकता या गुणाची वाढ होऊ लागल्याने मित्र बनवण्यास सुरवात होते. या वयातील मुलांना समूहात रहायला आवडते.     
5) पाचवा टप्पा –

 कुमारावस्था – १३ ते १९ वर्षे  -
या वयात पालकांनी आपल्या पाल्यांची जपणूक करावी .कारण या वयातील मुलांमध्ये शारीरिक तसेच मानसिक बदल होत असतात.  घरात त्यांच्याही मताला प्राधान्य द्यावे . घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी कुमारांचा सल्ला घ्यावा . व तसेच त्यांना योग्य ठिकांणी मार्गदर्शनही करावे . पालकांनी मुला-मुलींशी जवळीक साधावी , महत्वाचे म्हणजे आपल्या पाल्याला विश्वासात घ्यावे .

Wednesday, 5 December 2018

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 5

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 5


पालकत्वाचे टप्पे :- 
   पालकत्व हा साडेचार अक्षरी शब्द आहे मात्र त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे या पालकत्वाची सुरूवात कधी आणि कशी होते हा प्रश्न अनेक जणांच्या मनात येतो. 
1) पहिला टप्पा - 
   आपण आपल्या बाळाला केंव्हा आणि कशा मानसिक ,शारीरिक, आर्थिक परिस्थितीत जन्म द्यायचा यावर पतीपत्नी एकमेकांशी मनमोकळे पणाने चर्चा वा विचारविनिमय करतात त्या क्षणापासून पालकत्वाची सुरूवात होते . 
2) दुसरा टप्पा – 
   स्त्री गरोदर असते तो पालकत्वाचा दुसरा टप्पा होय . या टप्प्यावरती पोटातील गर्भ हा आईच्या भावनांशी जोडला गेलेला असतो. या कालावधीतील आईच्या शारीरिक, मानसिक स्थितीचा परिणाम हा बालकाच्या मनावरती होत असतो आणि हा परिणाम बालकाच्या जन्मानंतरच्या पुढील वाढीच्या ट्प्प्यावरती प्रभाव टाकतो. त्यामुळेच आपल्या अनेक शास्त्रांमध्ये देखील गर्भसंस्कारासंदर्भात चे महत्व सांगितले आहे. कारण आपल्या बाळाला काय आणि कसे बनवायचे आहे हे जर पालकांच्या मनात पक्के असेल तर त्याच्यावर संस्कार करण्याचा हा सगळ्यात सुंदर कालावधी आहे.    

Tuesday, 4 December 2018

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 4

आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 4

पालकत्वाचे प्रकार :-

3 )  सकारात्मक पालकत्व :- 
   
       आता आपण म्हणाल की मुलांना अधिकार दर्शक पालकांसारखे कडक शिस्तीत ठेवायचे नाही . किंवा शरणागत पालकांसारखे मुलांचे अति लाड करायचे नाहीत. तर मग कशा स्वरूपाचे पालकत्व असावे . तर याचे उत्तर आहे ‘सकारात्मक पालकत्व’ . ‘सकारात्मक पालकत्वाला अधिकार दर्शक पालकत्व व शरणागत पालकत्वाचा सुवर्णमध्य म्हणता येईल. 
   या प्रकारचे पालक हे मुलांना ,ना अति धाकात ठेवतात ना त्यांचे अति लाड करतात. सकारात्मक पालकत्वामध्ये पुढील तीन गोष्टी महत्वाच्या असतात.
     1) एकाच वेळी सह्रद्य व ठाम वागणे . 
     2) निर्णय प्रक्रियेत मुलांचा सहभाग . 
     3) मोठी माणसे व मुले यांच्यातील परस्पर आदर व सहकार्य . 
1) एकाच वेळी सह्रद्य व ठाम वागणे :- 
   सकारात्मक पालकत्वासाठी ही पहिली महत्वाची अट आहे. मुलांचा आदर राखला जाऊन त्यांच्या प्रगतीला वाव मिळवून देण्याच्या दृष्टिने सह्रद्य असणे व त्याचबरोबर पालक म्हणून स्वत:चा व परिस्थितीनुरूप गरजांचा आदर राखला जावा यासाठी ठामपणा देखील आवश्यक आहे. कडक शिस्तीच्या मार्गावर सह्रद्य लोप पावते तर लाडाच्या मार्गावर ठामपणा गायब होतो. सहृदयतेनं वागणं म्हणजे मुलांचा आणि स्वत:चाही आदर राखणं. मुलांचे लाड करणं म्हणजे त्यांचा आदर राखणं नव्हे. मुलांशी आदरानं वागणं म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणं. याचा अर्थ त्यांचं वाटेल ते वर्तन मान्य करणं असा नाही. त्याचप्रमाणे ठामपणा जेव्हा सहृदयतेच्या बरोबरीनं येतो तेव्हा त्याचा अर्थ असतो, सर्वांबद्दल सन्मानाची भावना, ममत्त्व आणि जिव्हाळा. सगळ्यांनी एकत्र आनंदानं रहायचं तर काही एक नियम असायलाच हवेत.
2) निर्णय प्रक्रियेत मुलांचा सहभाग :- 
       जेंव्हा सह्रद्याबरोबर ठामपणा येतो वागणे तेंव्हा त्याचा अर्थ असा होतो की सर्वांबद्दल सन्मानाची भावना , ममत्व , आणि जिव्हाळा .
सर्वांनी आनंदाने राहायचे तर काही नियम असणे गरजेचे आहे. उदा. मुलांनी किती वेळ टी.व्ही. पहावा या गोष्टीचा निर्णय घेत असताना केवळ पालकांनी स्वत:ला वाटणारे नियम केले व मुलांना जर त्यामध्ये विश्वासात घेतले नाही तर असे वेळापत्रक हे एक दोन दिवसांच्या पुढे चालणार नाही. परंतु त्या ऐवजी ही समस्या सोडवताना जे नियम तयार करणार त्यामध्ये मुलांचे विचार घेतले तर ते नियम मुले पाळतील .
   कुटुंबातील , शाळेतील निर्णय प्रक्रियेत , कामकाजामध्ये जर मुलांचा सहभाग घेतला तर मुलं स्वयंशिस्तीच्या दिशेने निश्चित बळावतील. 

3) मोठी माणसे व मुले यांच्यातील परस्पर आदर व सहकार्य :-
   गेल्या दोन शतकामधील झालेल्या वैचारीक प्रभोधनातून समाजमनात स्वातंत्र्य ,समता , बंधुता ,न्याय या मूल्यांची रूजवण झाली आहे त्यामुळे स्वत:चा आदर व सन्मान इतरांकडून राखला जावा ही इच्छा प्रत्येकाच्या मनात जागी होत आहे. मुलं हे सारे जवळून बघत आहे, अनुभवत आहेत.त्यामुळे वयानी मोठी होत जाणारी मुलं पालक शिक्षक जे म्हणतील ते सगळेच मानतील असे नही. मुलांची ही मानसिकता मोठ्या माणसांनी समजून घ्यायला हवी , त्यांच्या बरोबरचे वागणे बदलावे लागेल .परंतु हे करत असताना समजा मुलांची विरोध दर्शवणारी पध्दत ही राग आणणारी असेल तर तसे त्यांना स्पष्ट्पणे सांगावं पण मुलांना नेमक काय म्हणायचे ते सह्रद्य समजून घ्यायला हवे.
   म्हणजे मोठी माणसं ज्या प्रमाणे लहान मुलांकडून आपला आदर राखला जावा याची अपेक्षा करतात त्याच प्रमाणे त्यांनी देखील लहान मुलांचा आदर राखायला हवा. या ठिकाणी आदर याचा असा अर्थ आहे की घरातील आवश्यक अशा छोट्या-छोट्या निर्णयांमध्ये त्यांचे मत , विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. अशाप्रकारे मोठी माणसे व मुले यांच्यातील परस्पर आदर व सहकार्य हे आनंदायी पालकत्वासाठी महत्वाचे आहे.                

Sunday, 2 December 2018

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 3

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 3

पालकत्वाचे प्रकार :-

2) शरणागत पालकत्व ( संपूर्ण मोकळीक, लाड )
   
                                  या प्रकारातील पालक हे अधिकार दर्शक पालकत्व ( कडक शिस्त ) यांच्याबरोबर विरोधी प्रकारातील असतात . त्यामुळे यांच्याकडून मुलांना संपूर्णपणे मोकळीक , सूट दिलेली असते. या पालकांना शिक्षा करणे योग्य वाटत नाही त्यामुळे ते मुलांचे अति लाड करण्याचा दूस-या टोकाचा मार्ग अवलंबतात. हे पालक मुलांना अति स्वातंत्र्य देणारे, आवश्यक तेथे नियंत्रण ना ठेवणारे , कधी कधी अति काळजी करणारे असे असतात.त्यामुळे ते आपल्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमधील धोके देखील घेवू देत नहीत. मुलांना प्रेम दिल्यास त्या प्रेमापोटी ती साम्यजस पणे वागतात या विचारमुळे ती मुलांबरोबर खूप प्रेमाने वागतात. मुलांना प्रेम करणे म्हणजे त्यांची काळाजी घेणे , त्यांची संपूर्ण जबाबदारी स्वत: उचलणे, त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नहीत याची काळजी घेणे. त्यांना हवे ते देणे मात्र त्यांचाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणं. त्यांचे अशा प्रकारचे वागणे हे प्रेमापेक्षा अति लाडाच्या दिशेने जाणारे असते.
   पालकांच्या वागण्यामुळे मुले हट्टी स्वभावाची होतात. त्याच्यातूनच ही मुले स्वत: एकाद्या कामाची जबाबदारी स्विकारचे सोडून इतरांवरती ती ढकलण्याकडे यांचा कल असतो. ती दूस-यांवरती अवलंबून राहू लागतात.
   आईवडील या दोन्ही पालकापैकी वडील जर या प्रकारातील असतील तर वडीलांकडून पुरवलेल्या जाणा-या हट्टामुळे, अतिमवाळ स्वभामुळे , तर मुले वडिलांना अजिबात किंमत न देता आक्रमक बनतात. प्रसंगी वेडेवाकडे बोलून वडिलांचा अपमान करतात . जर आई या प्रकारात असेल तर ती मुलांचे अति लाड करते आणि मुलांच्या चूकीच्या ,  अविवेकी वागण्याचे सुध्दा समर्थन करत राहते. आईवडील दोघेही या प्रकारचे पालक असतील तर मुलच या दोघांचे पालक बनतात.त्यामुळे ही मुलं भोवतालच्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावण्यातच आपली सगळी शक्ती खर्च करू लागतात.