Wednesday, 1 February 2017

- दृष्टिकोन -  
     Z मराठीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पाहत असताना दि.31/01/2017 च्या कार्यक्रमात मनोरंजनाच्या व सामाजिक कार्यात अग्रगन्य असलेल्या महिलांना आमंत्रित करण्यात आले होतो. यामध्ये भारूड या लोककलेच्या माध्यमातून  जनजागृतीचे कार्य करणा-या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चंदाताई तिवाडी या देखील आल्या होत्या.सुरूवातीला इतर मान्यवर महिलांसोबत त्या जेव्हा चला हवा येऊ द्याच्या मंचावर आल्या त्यावेळी आपल्या गावाकडील सर्वसामान्य स्त्री प्रमाणे असणारा त्यांचा नऊवारी पेहराव पाहून त्यांच्या विषयी जास्त काही विचार मनात आले नाहीत. मात्र जेंव्हा त्यांना त्यांच्या कार्यासंदर्भात सुरूवात कशी झाली? असा प्रश्न विचारला त्यानंतर त्यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत बोलण्यास सुरवात केली आणि त्यांचे जीवनाविषयीचे विचार ऐकून मला फक्त विचार करायलाच नव्हे तर त्यांच्या विषयी थोडस लिहिण्यास ही भाग पाडले. खरच महान व्यक्ती घडतात त्या त्यांच्या अंगी अ‍सलेल्या महान विचारा मुळे , जीवनाकडे बघण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे. आणि याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे चंदाताई तिवाडी.
      भारूडाची सुरवात त्यांच्या जीवनात कशी झाली? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की लहान वयातच लग्न झाल्याने दोन मुले झाल्यावर त्यांना टी.बी. झाला. टी.बी. वाढत जाऊन जेव्हा तो तिस-या स्टेजला पोहचला तेंव्हा त्यांना वेगळ्या अशा खोलीत ठेवण्यात आले. त्या खोलीच्या शेजारीच असलेल्या मंदिरात त्यावेळी सप्ताह सुरू असल्या मुळे सतत भजन, कीर्तन, भारूडे गायली जात होती. व त्याचा आवाज चंदाताईंच्या कानावर पडत होता. त्यावेळी त्यांच्या मनात विचार येऊन गेला की आपल्याला जे जीवन मिळालेले आहे ते केवल या अंथरूणावर पडून मरून जाण्यासाठी नाही तर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी. व या विचारातूनच त्या पहिल्यांदा त्या खोलीतून स्वत:हून बाहेर पडल्या व मंदिराच्या पायरीवर बसून भजने,भारूडे ऐकली व तिथून पुढील सात दिवस त्यांचा तो नित्यक्रम झाला. व त्या स्वत: सुदधा ती भजने गुणगुणू लागल्या, म्हणू लागल्या. त्याचातूनच त्यांना नवीन ऊर्जा मिळून त्यांना पूर्वीपेक्षा अधिक बरे वाटू लागले.व त्या आजारातून बाहेर पडल्या.  
    हे ऐकत असताना आपल्याला वाटते की खरच हा चमत्कार घडला असेल व चंदाताई सुद्धा याला चमत्कारच म्हणतील पण त्या पुढे सांगतात की -“ हा काही चमत्कार नव्हता तर भजनाच्या ,भारूडांच्या गुणगुणण्यामुळे ,गायल्यामुळे माझ्या फुफ्फुसांचा व्यायाम होऊन फुफ्फुसांची काम करण्याची, श्वसनाची क्षमता सुधारली. व यातूनच मला टी.बी. शी लढण्याची नवीन शक्ती मिळाली.”
    या सकारात्मक दृष्टिकोनातूनच ब-या होऊन पुढे त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांच्या विरोधात भारूडांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य हाती घेतले व आजदेखील त्यांचे हे कार्य सुरू आहे.
     जर त्यांनी त्यावेळी त्या घटनेला किंवा त्यांच्यामधील सुधारणेला चमत्कार मानले असते तर समाज हिताचे कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली असती का.......?
     खरच अशा व्यक्तींना , त्यांच्या विचारांना व त्यांच्या कार्याला सादर प्रणाम........!
                                                                     धन्यवाद...!  
                दिलीप आप्पासो माने

                केंद्रशाळा उभादांडा नं. 1 ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग.

No comments:

Post a Comment